“६ डिसेंबर ” महापरिनिर्वाण दिन

एच. लोखंडे
पालघर :- ०६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीत महापरिनिर्वाण ( निधन ) झाले होते. यांच्या दुसर्या दिवशी ७ डिसेंबर रोजी त्यांचा पार्थिव मुंबईला राजगृहावर ( दादर ) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिन्दू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष डाँ. बाबासाहेब यांच्यावर बौद्ध पध्दतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्यावेळी हिन्दू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेब यांनी बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द लोक डॉ. बाबासाहेब यांना ” बोधिसत्त्व ” मानतात. यामुळे बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौध्द संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. काही वर्षानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिवर चैत्य उभारण्यात आला. डॉ. बाबासाहेब यांना श्रध्दांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संखेने बौध्द जनसमुदाय मुंबई येथील ( दादर ) शिवाजी पार्क – चैत्यभूमीवर १ डिसेंबर पासून येत असतो. डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थि दर्शनासाठी डॉ. बाबासाहेब यांचे अनुयायी / विचारवंत / तसेच देश – विदेशातील जनते करीता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
चैत्यभूमीवर अंदाजे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करीत दर्शन घेतात. या जनसमुदायाची काळजी बृहमुंबई महानगरपालिका,आंबेडकरवादी स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, स्वयंफुर्तीने घेत असतात. या दिवशी भारतात तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती बाबासाहेब यांची प्रतिमा / मुर्ती समोर ठेवून बाबासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. तसेच स्थानिक बौद्ध विहारे, सार्वजनिक स्थळी, शाळा / महाविद्यालये, शासकीय कार्यालये, आदी ठिकाणी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते स्मृतीस्थळांना वंदन करतात.