खोच बहुउद्देशीय केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांची भेट

पालघर दिनांक १ जानेवारी : आदिवासी विकासाच्या दिशेने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वाचे पाऊल टाकत पीएम जनमन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या खोच (पिंपळपाडा–शिरसोलीचा पाढा) येथील कातकरी बहुउद्देशीय केंद्राला जिल्हाधिकारी डॉ .इंदु राणी जाखड यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीत त्यांनी स्थानिक कातकरी समाजातील महिला व ग्रामस्थांशी थेट संवाद साधत, या केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा मार्ग स्पष्ट केला.
या केंद्रामुळे कातकरी समाजातील पुरुष व महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकास तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ . इंदु राणी जाखड यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्गदर्शन करताना, या केंद्राचा प्रभावी वापर केल्यास समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो, असे प्रतिपादन केले.“ग्रामीण भागात अशा बहुउद्देशीय केंद्रांची साखळी उभी राहिल्यास आदिवासी बांधवांचा आर्थिक कणा मजबूत होईल,” असे मनोगत व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केंद्राच्या दर्जेदार बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वतः गावात येऊन संवाद साधल्याने आम्हाला आत्मविश्वास मिळाला असून विकासाच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत, असे स्थानिक महिलांनी आनंदाने सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थितांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत, कातकरी बहुउद्देशीय केंद्र हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.



